कर्जत (प्रतिनिधी) : ग्रामसुरक्षा यंत्रणा कश्या प्रकारे प्रभावी ठरत आहे याची प्रचिती नुकत्याच घडलेल्या चांदे येथील घटनेने आली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या कामकाजात मदत होऊन नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत पोलिसांकडुन कार्यान्वित करण्यात आलेली 'ग्रामसुरक्षा यंत्रणा' तालुक्यासाठी वरदान ठरत आहे.
       लोकहिताचा हेतू व नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्याबाबत कर्जत पोलिस स्टेशनच्या वतीने ही संकल्पना मांडण्यात आली होती. पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी सहमती दर्शविली.   ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कर्जत पोलिसांनी परिश्रम घेत अनेक प्रात्यक्षिके घेतली.कर्जतच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना व नागरीकांना सहभागी करत कार्यशाळा घेतल्या.आता पोलिस यंत्रणेबरोबरच सर्वच विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडुन या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करण्यात येत असुन नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सुटत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासन व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचना व माहिती याच ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत एकाच फोनकॉलवर नागरीकांपर्यंत तात्काळ पोहचत आहेत.गुन्हेगारी व अनुचित घटना रोखण्यास मदत होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी चांदे येथे आग लागली होती आणि तेथील प्रतिनिधींच्या एकाच कॉलवर ७० ते ८० ग्रामस्थ काही वेळातच घटनास्थळी जमले व आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.कोरोना काळात सध्या पंचायत समिती, नगरपंचायत सक्षमपणे या यंत्रणेचा वापर करत लसीकरण,कोरोना चाचण्या,पाणी, घनकचरा, पाणीपट्टी, घरपट्टी आदींची माहिती नागरिकांना देत आहेत.कर्जतच्या पोलीस यंत्रणेने राबवलेल्या या उपक्रमाचा मोठा फायदा कर्जतच्या सर्वच प्रशासनाला आणि नागरिकांना होत आहे.सर्व नागरीकही प्रशासनाच्या कामात सहभागी होऊन त्यांना मदत करताना दिसत आहेत.



 ग्रामसुरक्षा यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे काम करत असून तालुक्यातील सर्व गावांची नोंदणी पूर्ण होत आली आहे. प्रत्येक कुटुंबातील किमान 2 सदस्यांनी आपल्या गावातील ग्रामसेवक अथवा पोलीस पाटील यांचेशी संपर्क साधून ग्रामसुरक्षा यंत्रणेमध्ये नोंदणी करून घ्यावी.
                  - चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक