
सचिन पोटरे यांचा आ. रोहित पवारांना टोला.
कर्जत (प्रतिनिधी) : कुकडीच्या पाण्याच्या राजकारणात पुणे जिल्ह्याला झुकते माप दिले जात असून कर्जत तालुक्यातील शेतकरी व शेती पाण्यासाठी आसुसलेली असताना आमदार रोहित पवार कुकडीच्या पाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीबरोबर का भांडत नाहीत असा प्रश्न भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी विचारला आहे. कुकडीच्या पाण्यासाठी आ रोहित पवार मॅनेज झाल्याचे दिसत आहेत.
कर्जत जामखेड च्या जनतेने रोहित पवार यांना दिलेल्या भरभरून प्रेमामुळे व देशाचे नेते मा. श्री. शरदचंद्र पवार यांचे नातू असल्याने या मतदारसंघात आता जादू होऊन काहीतरी जगापेक्षा वेगळं दिसेल अशी भोळी भाबडी आशा जनतेच्या मनात निर्माण झाली होती, यामध्ये जनतेची काडीचीही चूक नाही कारण त्यावेळी इव्हेंट मॅनेजमेंट व इतर अनेक व्यवस्थेने तसे वातावरण केले गेले होते . या कोरोनाच्या काळात ही यावेळी मागच्या पेक्षा रोहित पवार सक्रियता चांगली आहे.राजकारणात आशा गोष्टी होतच राहतात परंतु आ रोहित पवार यांनी महाराष्ट्रात व राष्ट्रवादीच्या अंतर्गत च्या राजकारणात प्रोजेक्ट करत असताना कर्जत तालुक्याच्या च्या मूलभूत प्रश्नांकडे खूपच दुर्लक्ष केलं आहे त्यामुळेच शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर भाजपा ला रस्त्यांवर उतरून आवाज उठवायला लागला व अनेक प्रश्न निकाली ही लागले.
आ रोहित पवार निवडून आल्या पासून कुकडीच्या पाण्याच्या आवर्तनात कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांवर खूप अन्याय होतोय . कुकडीच्या पाण्याच्या राजकारणात पुणे जिल्ह्याला झुकते माप देत आहात हे स्पष्टपणे दिसून येत आहे . मागच्या महिन्यात विविध वृत्तपत्रात " कुकडीचे पाणी पुणे जिल्ह्याने पळवले .' अशा हेडिंगच्या बातम्या श्रीगोंदा ,पारनेर व कर्जत तालुक्यातून लागल्या यावर विरोधक म्हणून आ रोहित यावर यांच्यासह कार्यकर्त्यांना या संदर्भात प्रश्न उपस्थित केले परंतु कोणीच याची दखल घेतली नाही.
माजी पालकमंत्री श्री.प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सण 2014 पासून आ रोहित पवार निवडून येईपर्यंत कुकडीचे आवर्तने एकदम नियमितपणे व सुरळीत चालू होते . आ. रोहित हे कायम राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रतिक्रिया देत बसले आहेत. त्याच वेळी देशाच्या पंतप्रधान ते महाराष्ट्राच्या राजकारणावर ही नेहमी मत व्यक्त करत आहेत त्यानिमित्ताने कर्जत जामखेड मतदारसंघ चर्चेत राहतोय मात्र कुकडीच्या आवर्तनासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी व त्याची शेती आसुसलेली आहे हे आ रोहित पवार यांच्या लक्षात कस येत नाही असे सचिन पोटरे यांनी म्हंटले आहे.
कुकडीचे पाणी ही कर्जत तालुक्याची अस्मिता आहे व या अस्मितेच्या राजकारणात आ रोहित पवार मॅनेज झालेले दिसत असून कुकडीच्या पाण्यासाठी पुणे जिल्यातल्या लोकप्रतिनिधी बरोबर का भांडत नाहीत ?
आत्ताच्या 9 मे 2021 ला जर पाणी सुटणार असेल तर करमाळ्यात तेच पाणी 16 तारखेपर्यंत पोहचेल तिथे आठ दिवस पाणी सोडणार असतील तर ते पाणी 25 मे पर्यंत करमाळा तालुक्यात राहील आणि मग 25 मे पासून कर्जत तालुक्याला 10 दिवस पाणी म्हणजे 5 जून पर्यंत ते पाणी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे तोपर्यंत पावसाळा चालू झालेला असेल व थोडीफार राहिलेली पिके हातची निघून गेलेली असतील व मग नंबर श्रीगोंदा व पारनेर तालुक्याचा...? पावसाळ्यात पाणी..? म्हणजे " कुकडीच्या पाण्याचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे ' हे आ रोहित पवार यांच्या कसे लक्षात येत नाही ? मागच्या मार्च च्या दरम्यान मधील आवर्तन ही ज्वारी ची काढणी झाल्यानंतर सुटले होते त्यावेळी ही पाण्याचा काहीच उपयोग झाला नाही.
आरक्षणावर सुद्धा पुन्हा सुरुवात येथूनच होईल !
कोरोनाचा काळ होता म्हणून ठीक नाहीतर कर्जत तालुका आंदोलनाचा जनक आहे...या कर्जत मधेच मराठा क्रांतीची बीजे रोवली गेली आहेत येथेच आमच्या कोपर्डी च्या ताई ला न्याय मिळण्यासाठी मशाल पेटवली गेली होती आणि त्यामुळे आरक्षण विषयावर सुद्धा पुन्हा सुरवात येथूनच होईल. या अग्निकुंडात आम्ही कायम सक्रिय आहोत ....कदाचित आमचं दुर्दैव हे असेल आणि तुमचं नशीब की आम्हाला शरद पवार यांच्यासारखे आजोबा नाहीत परंतु या गोष्टीचा फायदा तरी आम्हाला मिळवून दिला पाहिजे...गेली काही वर्षे आम्ही कायम रस्त्यांवर लढतोय...त्यामुळे तुम्ही फार काळ आम्हाला दुर्लक्षू शकणार नाहीत...कोरोनाच्या काळात शेतकरी अजून मेटाकुटीला आला असून भविष्यात तरी कुकडीच्या पाण्याचा खेळखंडोबा होणार नाही याची काळजी आ रोहित पवार यांनी घ्यावी असे अनावृत्त पत्रात म्हंटले आहे.

