सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रशस्तीपत्राने गौरव; कर्जत पोलिसांचे होतेय कौतुक
कर्जत,दि.१६ जून(प्रतिनिधी) : आपल्या कुशल आणि प्रभावी कामामुळे 'सिंघम' म्हणुन ओळखले जाणारे कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पोलीस पथकाचा 'बेस्ट डिटेक्शन' म्हणुन अहमदनगरचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला.
कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक गुन्ह्यांचा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी काही तासांमध्येच तपास लावत अनेक आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहीजळगाव,निंबोडी, बुवासाहेबनगर कर्जत येथे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासकामाचे विशेष कौतुक होत आहे.यामध्ये माहीजळगाव येथील दरोड्याचा गुन्हा ४८ तासाच्या आत उघडकीस आणुन चोरीस गेलेले सोने व रोकड जवळपास सर्व मुद्देमाल हस्तगत केला.शिवाय गुन्ह्यातील चार आरोपींना कर्जत पोलिसांनी जेरबंद केले.तालुक्यातील निंबोडी येथे शेळ्या चोरीसाठी आलेल्या तीन चोरट्यांनी झटापटीत शेतकऱ्यांवर गोळीबार करून त्यांना जखमी करत पोबारा केला होता.त्या गुन्ह्याचा तपास लावत संबंधित गुन्हेगाराला परजिल्ह्यातून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.तसेच कर्जत बुवासाहेबनगर येथे झालेल्या घरफोडीतही चोरट्यांनी सोन्याचा ऐवज व रोकड लंपास केली होती या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना कर्जत पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक करून चोरीतील मुद्देमाल जप्त करून धाडसी कारवाई केली.या यशस्वी कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने,पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे,पो.हे.कॉ.अंकुश ढवळे,पो.हे.कॉ.प्रबोध हंचे,पोलीस नाईक पांडुरंग भांडवलकर,परी.पो.स.इ.किरण साळुंके,पो.कॉ.शाम जाधव,पो.कॉ.सुनिल खैरे,पो.कॉ.महादेव कोहक,पो.कॉ.गोवर्धन कदम,पो.कॉ.शाहूराज तिकटे,पो.कॉ.गणेश आघाव,पो.को.रविंद्र वाघ,पो.कॉ.जितेंद्र सरोदे,पो.कॉ.अमित बरडे,पो.कॉ.ईश्वर माने,पो.कॉ.सचिन वारे,पो.कॉ.संतोष फुंदे,पो.कॉ.उद्धव दिंडे,महिला पो.कॉ.कोमल गोफने आदींना प्रशस्तीपत्र देऊन नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गौरविण्यात आले.कर्जत पोलिसांची ही कामगिरी जनसामान्यात प्रतिमा उंचावणारी आहे.
कर्जतच्या 'खाकी वर्दीने' अनेकांचे पुसले अश्रु!
'कायदा व सुव्यवस्थेचे पालन करताना अनेक मोठ्या गुन्ह्यांची कर्जत पोलिसांनी उकल केली.धाडसी कारवायांमध्ये प्रसंगी अंगावर धारदार शस्त्रांचे वार झेलून आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी तपासकामात योगदान दिले आहे.चंद्रशेखर यादव यांच्या नियोजनातून कोव्हिडसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तर नागरिकांना दिलासा देणाऱ्या ठरल्या आहेत.कर्जतच्या खाकी वर्दीने अक्षरशः अनेकांचे अश्रु पुसले आहेत.'


