कर्जत,दि. २१ जून (प्रतिनिधी) : लग्नात मनासारखे वटकणे न लावल्याने रेशीमगाठ तुटल्याचा प्रकार कर्जत तालुक्यात घडला आहे. विवाह आटोपल्यानंतर नववधू आणि वर यांना जेवायला घातले जाते. यावेळी नवरदेवाच्या ताटाला वधूपक्षाकडून वटकण लावण्याची प्रथा समाजात रूढ आहे. मात्र हौसेने करावयाची ही प्रथा विवाहबद्ध झालेल्या वधू-वरांच्या रेशिमगाठी सोडण्यास कारणीभूत ठरत असेल तर ही बाब गंभीर आहे.
असाच प्रकार कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे रविवारी (दि.२०) घडला. सिद्धटेकचा वर हा नांदगाव येथील मुलीशी विवाहबद्ध झाला. लग्न समारंभ उत्साहात साजरा झाला. पुढे कन्येला पाठवणीच्या पूर्वी वधूवरांना जेवू घालण्याचा कार्यक्रम सुरु झाला. प्रथेप्रमाणे वधूपक्षाकडून २०० रुपये वटकण म्हणून ताटाला लावण्यात आले.
मात्र तेवढ्यावर वरपक्षाकडील लोकांचे समाधान झाले नाही. यांच्याकडून वाढीव पैशाची मागणी होवू लागली. वधूपक्षाने त्यास स्पष्ट नकार दिला. रुसवेफुगवे टोकाला गेले. वधुपित्याने मुलीची पाठवणी न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ग्रामस्थांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ हा गोंधळ सुरूच राहिला. मात्र वधुपित्याने अखेर पोलीस स्टेशन गाठले.
पोलीस अधिकाऱ्यांचा प्रयत्न
कर्जतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे विवाहस्थळी पोहोचले. त्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. वधूपित्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निर्णयावर ठाम होते. नववधू सज्ञान असल्याने पोलीस अधिकारी माने यांनी शेवटी नववधूचा निर्णय विचारला. मात्र तिनेही सासरला न जाण्याचा निर्णय स्पष्ट केला. शेवटी वर पक्षाकडील मंडळीला हिरमुसले होवून मुकाट्याने घर गाठावे लागले.


