मिरजगाव येथे नागरिकांनी लाडू वाटून एमआयडीसी ला तत्वतः मंजूरी मिळाल्याची अधिसूचना निघाली म्हणून आनंद व्यक्त केला त्यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांना नागरिकांनी लाडू भरवत त्यांचा सत्कार केला त्यावेळी आ राम शिंदे यांनी एमआयडीसी संदर्भातील केलेल्या प्रयत्नाची माहिती आणि विरोधकांच्या आरोपाचा चांगला खरपूस समाचार घेतला.
औद्योगिक वसाहतीचा सदोष प्रस्ताव शासनाने नाकारला तरी कर्जत बंद ?, शासनाने आता कोंभळी येथील जागेसाठी तत्वतः मंजुरी दिली तरी कर्जत बंद ?, कोणावर ईडीची कारवाई झाली तरी कर्जत बंद ?, कर्जत बंद करणाऱ्या बंद बहाद्दरानी कन्नड साखर कारखान्याची मालमत्ता इडीने जप्त केल्यावर कर्जत बंद का केले नाही ? सवाल करत आ प्रा राम शिंदे यांनी राजकीय भूमिका घेऊन बंद करणारांवर टीका केली.
वालवड सुतगिरणी संदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा देखील समाचार त्यांनी यावेळी घेतला . सुतगिरणी सहकारी तत्वावर होती, भूमिपूजनाच्या वेळेस मी आवर्जून सांगितले होते त्याचे व्हिडिओ आजही पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहेत . विरोधकांनी खातरजमा करावी . ..शासनाने या सहकारी सुतगिरणीसाठी १० कोटी रुपये दिले होते असे असताना मुख्य प्रवर्तक श्री गुगळे यांनी ती बंद का केली? त्यांना मविआ सरकार आल्यावर कोणी त्रास दिला?याची योग्य व्यासपीठावर पोलखोल निश्चित करणार आहे असे म्हणत म . रो ह यो .विहिरीच्या चौकशीसाठी कोणी दबाव आणला ? माहिती कागदपत्रासहित जनतेपुढे मांडू असेही प्रतिपादन आ .राम शिंदे साहेब यांनी केले. मोफत पाणी पुरवठा करण्याचे नाटक सेवाभावी संस्था पुढे करत करायचे आणि झेपत नाही म्हणून शासनाकडे परवानगीची नाटके करत बंद करायचे, २०१९ च्या विधान सभेच्या निवडणुकीत तुम्ही पाणी वाटत होतात निवडणुक असूनही कधी प्रतिबंध केला नाही मग आता कशासाठी करायचा? तुमच्या राजकारणासाठी जनतेला तुम्ही वेठीस धरू नका . तुम्ही जनतेला मोफत पाणी देऊ शकत नाही फक्त देण्याचे नाटक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करता आता त्याचा फारसा उपयोग होणार नाही हे तुमच्या लक्षात आल्यामुळे परवानगीचे नाटक करत तुम्ही ते बंद केले आहेत . कर्जत जामखेड मधील जनतेचे हिरं का भाजता? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.
तुकाई उपसा सिंचन योजनेची खिल्ली उडविली, पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले, सरकार असताना विविध परवानग्याच्या नावाखाली योजना हेतुपुरस्पर बंद ठेवली, महायुतीचे सरकार आल्यानंतर मी योजनेला गती दिली पुढील ओव्हर पलोच्या आवर्तनाला प्रत्येक तळ्यात पाणी सोडले जाईल असे म्हणत दोन महिन्यात योजना कार्यान्वित करणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला . नागरिकाशी मुक्त संवाद करताना त्यांनी सांगितले कि एमआयडीसी इतक्या कमी कालावधीत मंजूर होणे हेच मुळात विरोधकांच्या पचनी पडलेले नाही त्यातही एमआयडीसी साठी जागा लोकांनी निवडलेली आहे . अवर्षण प्रवण भागातील जनतेसाठी हा एक मोठा दूरगामी परिणाम करणारा निर्णय होणार आहे . त्यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत . त्यांना फक्त व्यवहार कळतो . कोणाचे तरी आर्थिक हितसंबंध जपताना जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे त्यांचे धोरण आहे . आमदार आणि मविआ सत्ता स्थानी असण्याच्या काळात कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक त्यांच्याकडून झालेली नाही त्यामुळे ते उद्विग्न अवस्थेत असून बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानत आहेत असे प्रतिपादन आ.राम शिंदे यांनी केले .
यावेळी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, मा जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, अशोक खेडकर, अमृत लिंगडे, प्रशांत बुद्धिवंत, नितीन खेतमाळस, डॉ . रमेशचंद्र झरकर, संदिप बुद्धिवंत, संपत बावडकर, लहू वतारे, नंदू नवले, तात्या खेडकर, दत्ता मुळे, काशिश्वर बुद्धिवंत, संतोष कोरडे, कैलास बोराडे, सारंग घोडेस्वार, मिनिनाथ शिंदे, हरिदास केदारी, सोमनाथ साबळे, संग्राम घोडके, साई अँग्रो चे माने, आदिसह परिसरातील नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
औद्योगिक वसाहत कर्जत तालुक्यासाठी कोंभळी, रवळगाव, थेरगाव या ठिकाणी महायुती सरकारने तत्वतः मान्यता दिली असून आता पुढील कायदेशीर प्रकिया थोड्याच दिवसात पूर्ण होऊन एमआयडीसी होण्याच्या हालचालीना वेग आला आहे . मिरजगाव परिसरासाठी अत्यंत दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय आहे .अवर्षण प्रवण भागात एमआयडीसी होण्यामुळे कोंभळी, मिरजगाव परिसराचा कायापालट होणार आहे . एकूणच कर्जत तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे त्यामुळे याचा आनंद कर्जत तालुक्यातील प्रत्येक नागरिकाना होणे साहजिक आहे . त्यामुळे महायुती सरकार आणि आ .राम शिंदे साहेब यांचे ऋण व्यक्त केले त्यांना नागरिकांनी धन्यवाद दिले . लाडू वाटून आनंद व्यक्त केला.
- शेखर खरमरे (तालुकाध्यक्ष, भाजपा)


