जामखेड (प्रतिनिधी) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगाव येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी "ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम – 2025-26" अंतर्गत वंजारवाडी गावात विविध उपक्रम राबवीत आहेत. या उपक्रमांमध्ये कृषीकन्या शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आयोजित करत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून माती नमुना संकलन व माती परीक्षण या विषयावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांना मातीचे नमुने योग्य पद्धतीने कसे घ्यावेत, नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी आणि माती परीक्षणाचे महत्त्व काय आहे हे सविस्तर समजावून सांगण्यात आले. तसेच विविध पिकांसाठी मातीचे नमुने घेण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक कृषीकन्यांनी दाखवून दिले.
कोणतेही पीक घेण्यापूर्वी माती परीक्षण केल्यास जमिनीची सुपीकता व अन्नद्रव्यांची कमतरता समजते. त्यानुसार आवश्यक तेवढेच खत व पाणी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊन अधिक नफा मिळू शकतो, हेही शेतकऱ्यांना स्पष्ट करण्यात आले. या प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन कृषीकन्या प्रणाली अडसुळ ,दिक्षा अनभुले, पल्लवी बोरकर, क्रांती चटाले, पायल देशमुख व सानिया देशमुख आले यांनी केले.
या उपक्रमास महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ वामन, केंद्रप्रमुख व मृदा शास्त्र विषयतज्ञ डॉ. प्रेरणा भोसले, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. संदीप मोरे तसेच कार्यक्रम अधिकारी व कृषि अर्थशास्त्र विषयतज्ञ डॉ. उत्कर्षा गवारे यांचे मार्गदर्शन लाभले.